बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वयाच्या ७८व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन

मुंबई (वास्तव संघर्ष) मराठीसह हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा अवीट ठसा उमटविणारे आणि शोले चित्रपटातील कालिया पात्र अजरामर करणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वृद्धापकाळाने निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. गावदेवी येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. विजू खोटे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी ११ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

अभिनेते विजय खोटे यांनी आपल्या चतुरस्त्र अभिनयाने हिंदी-मराठी सिनेमा सृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. मराठी रंगभूमीबरोबर त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटात दमदार भूमिका केल्या. भारतीय सिने इतिहासात विशेष नोंद केल्या गेलेल्या शोले सिनेमातील कालियाची भूमिका प्रेक्षकांच्या मनात कायमची कोरली गेली.

  शोलेतील गब्बर जेव्हा अबे ओ कालिया, तेरा क्या होगा?, असे विचारतो तेव्हा कालिया घाबरत उत्तर देतो, ‘कु..कु..छ नही सरकार, मैने तो आपका नमक खाया हैं’ हा संवाद अंत्यंत गाजला. १९७५ मध्ये प्रदर्शित झालेल्या सिनेमाची चर्चा होते, तेव्हा कालियाचं पात्र हमखास चर्चेत येतं.

Share this: