बातम्यामहाराष्ट्र

महायुतीचा घटक रिपब्लिकन पक्षाला ६ जागा निश्चित;रामदास आठवले यांनी चार उमेदवारांची नावे केली जाहीर

माळशिरस च्या बदल्यात पुणे कॅन्टोन्मेंट जागा बदलण्याची रिपाइं ने मुख्यमंत्र्यांना केली सूचना

मुंबई (वास्तव संघर्ष) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी मागील 3 दिवस झालेल्या सलग चर्चेत आज अंतिम निर्णय होऊन भाजप शिवसेना महायुतीचा घटक म्हणून रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या ६ जागा अधिकृत सोडण्यात आल्या आहेत. त्यात सातारा जिल्ह्यातील फलटण ;सोलापुरातील माळशिरस ; विदर्भात भंडारा ; मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यातील नायगाव; परभणी जिल्ह्यातील पाथरी तसेच मुंबईतील मानखुर्द शिवाजीनगर या ६ जागा रिपाइं ला सोडण्यात आल्या असल्याची अधिकृत घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी बांद्रा संविधान निवासस्थानी पत्रकार परिषदेत केली आहे.

माळशिरसची जागा रिपब्लिकन पक्षाला सोडण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघात उमेदवाराचे नाव निश्चित करण्याचा निर्णय विजय सिंह मोहिते पाटील घेणार आहेत. मात्र त्यांनी माळशिरस मध्ये रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्याला उमेदवारी निश्चित करावी तसे होणार नसेल तर माळशिरस ची जागा बदलून पुणे कॅन्टोन्मेंट ही जागा देण्यात यावी अशी सूचना आज केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे.

रिपाइं च्या उमेदवारांची नावे :-
मुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर मधून रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे
फलटण मधून दिपकभाऊ निकाळजे
पाथरी मधून मोहन फड ( आमदार )
नायगाव मधून राजेश पवार
ही नावे निश्चित झाली असून माळशिरस ; भंडारा या दोन जागांची नावे लवकरच जाहीर करू असे ना रामदास आठवले म्हणाले.
काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप शिवसेने मध्ये प्रवेश करीत आहेत.रिपाइं साठी आनंदाची बाब म्हणजे भाजप मधील काही कार्यकर्ते रिपब्लिकन पक्षात प्रवेश करीत आहेत. त्यानुसार नांदेड मधील भाजप चे नेते राजेश पवार यांनी रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला असून त्यांना रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी नायगाव विधानसभा मतदारसंघातून दिली आहे. तसेच परभणी चे भाजप नेते आमदार मोहन फड यांनी रिपाइं मध्ये प्रवेश केला असून त्यांना रिपब्लिकन पक्षाची अधिकृत उमेदवारी पाथरी विधानसभा मतदारसंघातून देण्यात आली आहे.

मानखुर्द शिवाजी नगर मतदारसंघ शिवसेनेच्या कोट्यात आहे तरी शिवसेने ने सामाजिक दृष्ट्या विचार करून ती जागा रिपाइं ला सोडायला हवी. याबाबत शिवाजी नगर मानखुर्द मतदारसंघ रिपाइं ला सोडण्यात आला असून शिवसेनेच्या उमेदवाराला उमेदवारी मागे घेण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे आश्वासन दिले आहे. रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून रिपाइं चे अधिकृत उमेदवार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले.

सामाजिक दृष्ट्या विचार करून शिवसेने काही जागा रिपाइं ला सोडायला हव्यात. पिंप्री ; चेंबूर या अमच्या जागा थोड्या मताने मागील 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या. शीवसेनेच्या सर्व उमेदवारांना रिपब्लिकन पक्षाची मते मिळणार असून त्यांच्या सर्व जागा आम्ही निवडून आणू. त्यासाठी मी स्वतः भाजप प्रमाणे शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करणार असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. त्यामुळे शिवसेनेने त्यांच्या कोट्यातील मानखुर्द शिवाजीनगर ही विधानसभेची जागा रिपाइं ला सोडावी अशी आग्रही मागणी ना रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी आज झालेल्या चर्चेत रिपब्लिकन पक्षाला केंद्रात कॅबिनेट मंत्रीपद तसेच येत्या सन 2020 मध्ये रिक्त होणारी राज्यसभेची एक जागा रिपाइं ला देण्यात यावी; राज्यसरकार मध्ये रिपाइं ला एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्रीपद तसेच दोन विधान परिषद सदस्यत्व ; राज्यमंत्री दर्जा असलेली तीन महामंडळ अध्यक्षपदे ; प्रत्येक महामंडळात एक सदस्य आणि जिल्हा तालुका शासकीय समित्यांमध्ये रिपाइंला सदस्यत्व तसेच प्रत्येक जिल्ह्यात १०० कार्यकर्त्यांना एस ई ओ पदे असा सत्तेतील वाटा रिपब्लिकन पक्षाला देण्यात यावा असा प्रस्ताव देण्यात आला. त्यावर सरकार निवडून आल्यावर रिपब्लिकन पक्षाला सत्तेतील वाटा देऊन योग्य न्याय देऊ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याची माहिती ना रामदास आठवले यांनी आज दिली.

Share this: