धक्कादायक :पिंपरी चिंचवड आरोग्य विभागाचा कारभार चव्हाटय़ावर ;नदीकिनारी सापडले मुदत न संपलेली औषधे

पिंपरी(वास्तव संघर्ष) पिंपरी चिंचवड महापालिकेच्या परिसरातील पवना व इंद्रायणी नदी या दोन मोठय़ा नद्या वाहतात. मात्र याच नद्यांची दुरावस्था झालेली दिसून येत आहे. पवना नदी. जलपर्णी, कचरा, प्लॅस्टिकने, दूषित पाण्याने तिचा श्वास कोंडत आहे. रोजचा कचरा, निर्माल्य, हॉटेलमधील उरलेले अन्न असे बरेच काही यामध्ये टाकले जाते. हे कमी म्हणून की काय, मुदत न संपलेली अनेक औषधे, इंजेक्शन इ. नदी पात्रात टाकल्या गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

देशात गोरगरिबांना स्वस्तात औषध उपचार व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजनेत अल्पदरात औषध उपलब्ध करुन दिली. पण कोणीतरी ही मुदत न संपलेली अनेक औषधे, इंजेक्शन नदी पात्रात अक्षरशः फेकून दिली आहेत. यामध्ये जवळपास ३० इंजेक्शन आणि विविध प्रकारचे औषधे ह्या कचऱ्यात टाकण्यात आली होती. थेरगाव येथील केजुबाई घाटावर स्वछता करताना पर्यावरण प्रेमींनी हा प्रकार निदर्शनास आला

औषधांच्या बाटल्या, सिरींज व त्यांची खोकी इत्यादी जैविक वस्तू उघड्यावर टाकण्यात आल्याने या वस्तू पुन्हा बाजारात येण्याची, तसेच एखाद्या व्यक्तीने ती वापरल्यास त्यांच्या जिवाला धोका पोहचण्याची शक्यता आहे. औषधे खरेदी करण्यासाठी औषधाच्या दुकानात गेल्यानंतर नजरेस पडणारी अनेक औषधे सध्या नदी काठी पडलेली दिसून येत आहेत. सुट्ट्या गोळ्या, कॅप्सूल्सची पाकिटे, इंजेक्शन स्वरूपात देण्यासाठी लहान बाटल्यांमध्ये उपलब्ध असलेली द्रवरूप औषधे, उच्च दर्जाची प्रतिजैविके, वेदनाशामक गोळ्या, मलम, प्रोटीन आदी कचऱ्यामध्ये आहेत.

यापैकी बरीचशी औषधे २०२० च्या दरम्यान मुदत संपणारी आहेत. मानवी आजारांवर दिल्या जाणाऱ्या औषधांचा या कचऱ्यामध्ये समावेश आहे.खोक्यांमध्ये किंवा पोत्यांमध्ये भरून हा कचरा नदीत टाकला जात असावा अशी शंका पर्यावरण प्रेमी व्यक्त करीत आहेत. अनेकदा ही औषधे जाळण्याचे कामही या परिसरात सुरू असते. त्यातून निर्माण होणाऱ्या धुरामुळे येथे  श्वास घेणे अवघड होते. केजुबाई बंधारा परिसर निसर्गरम्य असून मोकळी हवा हे या परिसराचे वैशिष्टय़ आहे. अशा भागात औषधांचा कचरा जाळून येथे पर्यावरणाचे आणि पर्यायाने हवेचे,नदीच्या पाण्याचे  प्रदूषण होत आहे

दरम्यान नदी किनारी सापडलेल्या सुस्थितीत असणाऱ्या औषधांच्या पाकिटावर भारतीय जनऔषधी परियोजना असा उल्लेख असून ही औषधे प्रधानमंत्री भारतीय जन औषधीक योजने अंतर्गत जनसामान्यांना, गोरगरिबांना अल्पदरात विविध औषध उपलब्ध व्हावी म्हणून या योजनेतून औषधे पुरवण्यासाठी योजना चालू केली गेली आहे.

Share this: