बातम्यामाझं पिंपरी -चिंचवड

भोसरी बायपास रोडसाठी आमदार महेश लांडगेंचा पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक’

भोसरीमधील आळंदी रोड होणार वाहतूक कोंडीमुक्त;गेल्या ३० वर्षांपासून रखडलेल्या रस्त्याला अखेर हिरवा कंदिल


पिंपरी(वास्तव संघर्ष) भोसरीतून आळंदी रस्त्याने प्रवास करण्यासाठी आता वाहनचालक- नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भोसरी बायपास रोडचे काम हाती घेतले असून, जमीन मालक (शेतकरी) आणि प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक समझोता करुन आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनुसार रस्त्याचे काम सुरुही झाले आहे.


आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी सकाळी या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, नगरसेवक ॲड. नितीन लांडगे, सागर गवळी, भीमाताई फुगे, सोनाली गव्हाणे, सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, राजेंद्र लांडगे, रवि लांडगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


भोसरी- आळंदी रस्ता म्हणजे पिंपरी-चिंचवडमधील ‘लक्ष्मीरोड’ आहे. या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात व्यावसायिक आहेत. भोसरीतील व्यापार विश्वाची ‘हर्टलाईन’ म्हणून या परिसराची ओळख आहे. भाजी मंडई, दोन गार्डन, मंगल कार्यालये, दोन पेट्रोलपंप या रस्त्यावर आहेत. त्यामुळे अत्यंत वर्दळीचा असलेल्या या रस्त्याची वाहतूक कोंडीतून मुक्तता करण्यासाठी पर्यायी रस्ता किंवा उड्डाणपूल उभारण्याची आवश्यकता होती.


पिंपरी-चिंचवड महापालिकेची स्थापना १९८६ मध्ये झाली. तत्पूर्वी, पिंपरी-चिंचवड नगरपालिका होती. गेल्या ३० वर्षांपासून राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते. प्रत्येक निवडणुकांमध्ये राजकीय व्यक्तींनी भोसरी वाहतूक कोंडीमुक्त आणि बायपास करणार अशी आश्वासने तत्कालीन पुढाऱ्यांनी दिले. मात्र, रस्ता कधीही अस्तित्वात आला नाही, अशी खंत स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये होती.


दरम्यान, महापालिका निवडणुकीतील सत्ता स्थापनेनंतर (२०१७) भोसरी विधानसभा मतदार संघात अंतर्गत रस्ते आणि बाह्य रस्त्यांचे जाळे निर्माण करुन समाविष्ट गावाची ‘कनेक्टिव्हीटी’ वाढवण्याच्या दृष्टीने आमदार लांडगे यांनी पुढाकार घेतला. वास्तविक, भोसरी बायपास रस्ता विकास आराखड्यामध्ये (डीपी) समाविष्ट नाही. परंतु, नागरिकांच्या हितासाठी हा रस्ता करणे आवश्यक होते. परिसरातील नागरिकांनी याबाबत प्रशासनाकडे मागणी केली होती.


का महत्त्वाचा आहे भोसरी बायपास रोड?
आळंदी रस्ता आणि दिघी रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी (पीकअवर) मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. लहान-मोठ्या अपघातांची संख्याही वाढली आहे. दिघी अथवा आळंदीकडे जाण्यासाठी भोसरीतून समांतर रस्ता उपलब्ध नव्हता. चक्रपाणी वसाहत चौक, शास्त्री चौक, रोशन गार्डन, लांडगेनगर, फुगेवस्ती, वाळकेमळा, देवकर वस्ती या महत्त्वाच्या परिसराशी ‘कनेक्टिव्हीटी’ असलेला प्रशस्त रस्ता उपलब्ध नव्हता. भोसरी बायपास रस्त्यामुळे वरील सर्व चौकांची कनेक्टीव्हीटी मिळणार आहे. आळंदी तसेच, पुणे अथवा विश्रांतवाडीकडे जाण्यासाठी वाहकांचा वेळ वाचणार आहे. अपघातही कमी होणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम मार्गी लागणे अत्यावश्यक होते.


भोसरीतील रस्त्यांसाठी पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राईक’
भोसरीतील कनेक्टिव्हीटीच्या दृष्टीने गेल्या अनेक वर्षांपासून जागा मालक आणि प्रशासनाच्या वादात रखडलेल्या रस्त्यांच्या कामे पूर्ण करण्याचा निर्धार आमदार महेश लांडगे यांनी केला. दिघीतील दोन रस्ते पूर्ण केल्यानंतर आता भोसरी बायपास रस्त्याचे काम मार्गी लागले आहे. महापालिका प्रशासनाशी समन्वय साधून सुमारे ३८ जागा मालकांनी रस्त्यासाठी पुढाकार घेतला आहे. लांडगे, गव्हाणे, देवकर, फुगे, गवारे, वाळके, गवळी, चव्हाण आदी कुटुंबियांनी रस्त्याच्या कामासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. याकामी आमदार लांडगे यांनी दिघीनंतर पुन्हा एकदा ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला, अशी चर्चा रंगली आहे.


असा आहे रस्ता…
पुणे- नाशिक महामार्गावरील सदगुरूनगरपासून ते भोसरी-आळंदीरोवरील फुगेवस्ती- वाळकेमळा असा रस्ता आहे. हा रस्ता भोसरीच्या मुख्य चौकापासून अलीकडे (नाशिकच्या दिशेने) एक किलोमीटर अंतरावर सुरू होतो. तसेच, आळंदी रोडवरील फुगेवस्ती- वाळकेमळा मॅझिन चौकाजवळ संपतो. दोन किमी असलेल्या या भोसरी बायपास रस्त्यावर केवळ कार, दुचाकी, छोटी वाहने यांनाच परवानगी असणार आहे. या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी असणार आहे. ९ मीटर रुंदीचा असलेला हा रस्ता अवघ्या सहा महिन्यांमध्ये पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

Share this: