मुंबईतील तरूणांचे 35 लाखाच्या खंडणीसाठी आकुर्डीतून अपहरण ;पोलिसांनी सापळा लावून आरोपींना केली अटक

पिंपरी (वास्तव संघर्ष) :गुंतवणूकीसाठी पैसे घेण्यासाठी मुंबईतून आलेल्या एका व्यापाऱ्याच्या मॅनेजरचे तीन जणांनी अपरहरण केले . त्याला सोडविण्यासाठी 35 लाखांची खंडणीही मागण्यात आली . ही घटना शनिवारी आकुर्डी येथे घडली . तीन दिवसानंतर पोलिसांनी चिंचवड येथील डांगे चौकातून अपहरण झालेल्या मॅनेजरची सुटका करत आरोपींना अटक केली आहे.

राहूल तिवारी ( वय 27 , सध्या रा . सिल्व्हर सेव्हन हॉटेल , आकुर्डी ) असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे .

अमर कदम , शशांक कदम आणि हरिश राजवाडे ( पूर्ण नाव , पत्ता माहिती नाही ) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत .

राजकुमार मनोहरसिंग ( वय 43 , रा . लोखंडवाला कॉम्प्लेक्स , कांदिवली , मुंबई ) यांनी याबाबत निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी राजकुमार हे आपले मॅनेजर राहूल तिवारी यांच्यासह आकुर्डीतील सिल्व्हर सेव्हन या हॉटेलमध्ये कामानिमित्त राहण्यासाठी आले होते . त्यांचा मॅनेजर राहूल तिवारी हा काळेवाडीतील नाना काळे यांच्याकडून गुंतवणूकीसाठी पाच लाख रुपये आणण्यासाठी गेला होता . पैसे आणण्यासाठी गेल्यानंतर राहुलचा फिर्यादी राजकुमार यांना फोन आला . मी पाच लाख रुपये आणले आहेत , मात्र मला वाचवा , असे म्हणून त्यांनी फोन कट केला . अर्धा तासाने राजकुमार यांनी राहूल यांच्या मोबाइलवर फोन केला असता तो राजकुमार याच्या ओळखीच्या आरोपी अमर कदम याने उचलला . राहूलला सोडायचे असेल तर 35 लाख रुपये द्या , असे म्हणत खंडणीची मागणी केली .

दोन तासांनी पुन्हा राहूल याच्या फोनवरून फिर्यादी राजकुमार यांना फोन आला . आत्ताच्या आत्ता पैसे द्या नाहीतर राहूलला मारून टाकु , अशी धमकी फोनवरून देण्यात आली . रविवारी सकाळी दहा वाजता पुन्हा राहूल यांच्या फोनवरून फोन आला . त्यावेळी राहूल बोलला की पैशाची व्यवस्था झाली आहे का , शशांक कदम , अमर कदम आणि हरिश राजवाडे ही लोक मला मारून टाकतील . त्यानंतर अमर कदम आणि शशांक कदम हे बोलू लागले . तेव्हा फिर्यादी राजकुमार यांनी पैशाची व्यवस्था करीत असल्याचे आरोपींना सांगितले .

सोमवारी ( दि . 12 ) पुन्हा आरोपींचा फोन आला व त्यांनी पैशाची व्यवस्था झाली का , अशी विचारणा केली . मात्र बँकेच्या सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्याचे राजकुमार यांनी सांगितले . माझी माणसे पाठवतो त्यांना पैसे देऊन टाका , असे आरोपींनी सांगितले . खंडणीसाठी वारंवार फोन येऊ लागल्याने अखेर राजकुमार यांनी पोलिसांत धाव घेतली . पोलिसांनी सापळा लावून आरोपींना मंगळवारी पहाटे डांगे चौक परिसरातून ताब्यात घेतले . तसेच अपरहण झालेल्या राहुल तिवारी यांची सुखरूप सुटका केली . अधिक तपास निगडी पोलीस करीत आहेत .

Share this: