अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय राज्य सरकारला आत्मचिंतन करायला लावणारा – रामदास आठवले

मुंबई (वास्तव संघर्ष) – महाविकास आघाडी सरकार च्या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावरच मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री कंगना राणावत प्रकरणी दिलेला निकाल राज्य सरकार ला आत्मचिंतन करायला लावणारा आहे. कंगना राणावत यांचे बांधकाम बेकायदेशीर ठरवून मनपा ने केलेली कारवाई वैक्तिक द्वेषातून; सुडबुद्धितून केलेली कारवाई असल्याचा ठपका राज्य सरकार वर उच्च न्यायालयाने ठेवला असून उच्च न्यायालयाच्या या निर्णयाने राज्य सरकारने आत्मचिंतन करावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

बांद्रा येथील पालिहिलमधील अभिनेत्री कंगना राणावत च्या बंगल्यावर मुंबई महापालिकेने केलेली कारवाई बेकायदेशीर सुडबुद्धितुन केली असून तिचे झालेले नुकसान भरून देण्याचे आणि बांधकाम पुन्हा बांधून देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयाचे आपण स्वागत करीत असल्याचे ना. रामदास आठवले म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार ने वर्षभर केलेल्या कामाच्या आधारावर राज्य सरकारला किती गुणा द्यावेत याबाबत जनतेला प्रश्न केला तर जनता महाविकास आघाडी सरकार ला नापास सरकार अशी संभावना करीत 100 पैकी 30 गुण देईल असा टोला ना.रामदास आठवले यांनी राज्य सरकार ला लगावला आहे.

कोरोना च्या संकटात राज्य सरकार ने निर्णय घेण्यात केलेली दिरंगाई; विजबिल माफीवरून जनतेच्या डोळ्यांत राज्य सरकार ने केलेली धूळफेक आणि कंगना राणावत; अर्णब गोस्वामी प्रकरणी राज्य सरकार ची दिसलेली सुडबुद्धि हे राज्य सरकार ला शोभणारे नाही.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हात धुवून विरोधकांच्या मागे लागणार अशी धमकी देणे हे संविधानिक पदावर असलेल्या जबाबदार व्यक्तीला शोभणारे नाही; लोकशाहीत विरोधकांचा सन्मान करायचा असतो; प्रश्न विचारणाऱ्यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे असते. हात धुवुन मागे लागायचे नसते. विरोधकांच्या मागे हात धुवून लागणार ही मुख्यमंत्र्यांनी दिलेली धमकी संविधानिक दृष्ट्या चूक; लोकशाहीला मारक भूमिका आहे असे मत ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

Share this: