बातम्यामहाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचा संतापाचा उद्रेक : महाराष्ट्रभरात वणवा पेटला, वल्लभनगर आगारातही बेमुदत बंद!

पिंपरी (वास्तव संघर्ष) :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एमएसआरटीसी) राज्यशासनाकडे विलिनीकरण करावे, या मागणीसाठी वल्लभनगर आगारातील 294 कर्मचाऱ्यांनी सोमवारी बेमुदत बंद सुरू केला. त्यामुळे पिंपरी-चिंचवडसह राज्य-परराज्यातून शहरातून प्रवास करणाऱ्या सव्वा लाख प्रवाशांना मिळणारी सेवा ठप्प झाली. महाराष्ट्रभरात पेटलेला वणवा आता पिंपरी-चिंचवडपर्यंत पोहोचला आहे.
राज्यातील एसटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी दि.27 ऑक्टोबर 2021 रोजी राज्यव्यापी बंद केला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने जुजबी मागण्या मान्य करुन एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहे. यापार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या एसटी कामगारांनी राज्यात ठिकठिकाणच्या आगारांमध्ये बेमुदत बंद सुरू केला आहे.

वल्लगनगर आगारात कर्मचाऱ्यांनी सोमवारी सुरू केलेल्या बेमुदत बंदमध्ये सहभाग घेतला. वाहक, चालक आणि इतर कर्मचारी असे एकूण 294 कर्मचारी या आगारामध्ये कार्यरत आहेत. बेमुदत बंदमुळे प्रवाशांना आगारातून परतावे लागत आहे. आगारातील नियमित वेळापत्रकानुसार 45 गाड्या संपूर्ण महाराष्ट्र- राज्याबाहेर प्रवास करतात. याव्यतिरिक्त अन्य आगारातून विविध ठिकाणी जाणाऱ्या सुमारे 250 गाड्या वल्लभनगर आगारातून ये-जा करीत आहेत. सरासरी सव्वा लाख प्रवासी या आगारातून ये-जा करतात.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला पाठिंबा दर्शवला आहे. आमदार लांडगे यांनी वल्लभनगर आगाराला भेट दिली. आगारातील कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.

आमदार महेश लांडगे म्हणाले की, कोरोनाची पहिली लाट आली तेव्हापासून एसटी कर्मचाऱ्यांचे पगार नियमित वेळेत होत नाहीत. आर्थिक विवंचनेतून आतापर्यंत राज्यात 34 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. दिवसागणिक आत्महत्या होत असताना महाविकास आघाडी सरकार ठोस निर्णय घेत नाही. महागाई भत्तामध्ये 28 टक्के वाढ केल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. तसेच, कोविड काळात कर्मचाऱ्यांना कोविड भत्ता देण्याबाबत घोषणा करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून एकाही एसटी कर्मचाऱ्याला कोविड भत्ता मिळालेला नाही. तुटपुज्या पगारामधून मूलभूत आर्थिक गरजा भागविणे शक्य होत नाहीत. महाविकास आघाडी सरकारकडून एसटी कामगारांवर अन्याय होत आहे. त्यामुळे एसटी कामगारांनी आपल्या न्याय्य हक्कासाठी केलेला बेमुदत संपास भारतीय जनता पार्टी पाठिंबा देत आहे.

उत्तरप्रदेशमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये पाच लोकांना चिरडल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने राज्यव्यापी बंद केला. महाराष्ट्रातील ३४ मराठी एसटी कामगारांनी आत्महत्या केली. मात्र, महाविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांसाठी एकही ठोस निर्णय घेतला नाही. एसटी कामगारांचा जीव कवडीमोल आहे का? असा सवाल आमदार लांडगे यांनी उपस्थित केला आहे.

एसटी कामगार ‘मराठी’ नाही का?

कोविड काळात परराज्यातील कामगार- मजुरांना त्यांच्या मूळगावी जाता यावे. यासाठी एसटी महामंडळाला विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले. परंतु, ‘मराठी’ माणसासाठी लढणारी शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाविकास आघाडी सरकाचे प्रमुख आहेत. महाराष्ट्रातील 34 मराठी एसटी कामगारांनी आत्महत्या केली. तरीही महाविका आघाडी सरकार किंवा मुख्यमंत्री ठाकरे ठोस निर्णय घेत नाहीत, ही महाराष्ट्रातील मराठी माणसाची शोकांतिका आहे, अशी खंत वल्लभनगर आगारातील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

Share this: