मुदत संपूनही निगडी, भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपुलाचे काम अपूर्ण
पिंपरी(वास्तव संघर्ष) ; निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर, वर्तुळाकार मार्ग या महत्त्वाकांक्षी प्रकल्प कामाची मुदत २६ डिसेंबर रोजी संपली आहे. तीन वर्षांच्या मुदतीत केवळ ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता या कामासाठी आणखी मुदतवाढ मिळावी म्हणून ठेकेदाराने महापालिकेकडे मागणी केलेली आहे. परंतु मुदतीत काम पूर्ण करून करदात्यांचे पैसे वाचविण्याचा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कोणताही प्रयत्न झालेला नाही. उलट या कामाला विलंब होईल आणि ठेकेदाराला जादा पैसे देऊन त्यातून वाढीव टक्केवारी खाण्याचा अधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. त्यामुळे या कामाला विलंब करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे. तसेच या कामाची जबाबदारी असणाऱ्या स्थापत्य विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रुपचे अध्यक्ष सतीश कदम यांनी केली आहे.
यासंदर्भात सतीश कदम यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, “पिंपरी चिंचवड शहराचे प्रवेशद्वार असलेल्या निगडीतील भक्ती-शक्ती चौकातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ९० कोटी ५३ लाख रुपये खर्चून उड्डाणपूल, ग्रेड सेपरेटर आणि वर्तुळाकार मार्ग करण्यात येणार आहे. महापालिकेने बी. जी. शिर्के या ठेकेदाराला २६ जून २०१७ रोजी या कामाचा आदेश दिला. तसेच कामाची मुदत ३० महिने म्हणजे २६ डिसेंबर २०१९ पर्यंत देण्यात आली होती. ही मुदत नुकतीच संपली आहे. गेल्या तीन वर्षांत अवघे ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. आता ठेकेदाराने या कामाला पुन्हा मुदतवाढ मागितली आहे. आ ठेकेदाराने १५ दिवसांपूर्वी स्पाइन रस्त्याला समांतर ग्रेड सेपरेटर तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या कामाला सहा महिन्यांहून अधिक कालावधी लागण्याची शक्यता आहे.
येथे ६० मीटर व्यासाचा वर्तुळाकार रस्ता तयार करण्यात येत आहे. त्याची तीन लेनच्या मार्गाची रुंदी १५.५ मीटर आहे. पण सध्या तो बंद केल्याने वळसा घेण्यासाठी एक ते दीड किलोमीटरपर्यंत जावे लागते. साईनगर-अंकुश चौकमार्गे भक्ती-शक्ती चौकाकडे येण्यासाठी वाहनचालकांच्या तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागलेल्या असतात. ग्रेड सेपरेटरचे काम सुरू असल्यामुळे एकच मार्ग सुरू वाहतुकीसाठी खुला असल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर मुरूम, खड्डे पडले असून परिसरात धुळीचा त्रास होत आहे. शेजारीच बस टर्मिनल असल्याने कोंडीत भर पडत आहे.
उड्डाणपुलाचे काम अनेक ठिकाणी अर्धवट आवस्थेत असून, नागरिकांना नाहक त्रासाला सामेरे जावे लागत आहे. संबंधित ठेकेदाराने वाढीव खर्च मिळणार असल्यामुळे या कामाला दिरंगाई केल्याचे दिसून येत आहे. त्याला अधिकाऱ्यांचेही पाठबळ आहे. ठेकेदाराला वाढीव खर्च दिल्यास अधिकाऱ्यांनाही वाढीव टक्का मिळतो हे उघड गुपित आहे. त्यामुळे मुदतीत काम करून करदात्या नागरिकांचे पैसे वाचविण्याचे सोडून अधिकाऱ्यांनी ठेकेदारासोबत संगनमत करून आपल्या टक्केवारीसाठी हे काम मुदतीत पूर्ण होऊ नये, याची पुरेपूर काळजी घेतल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे काम मुदतीत पूर्ण न केल्याने ठेकेदार बी. जी. शिर्के यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे. तसेच या कामाची जबाबदारी असणाऱ्या स्थापत्या विभागाच्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी सतीश कदम यांनी केली आहे.”