ई-पास रद्द करण्याबाबत अद्याप राज्य सरकारचा कोणताही निर्णय झाला नाही-अजित पवार
पुणे (वास्तव संघर्ष) : ई-पास रद्द करण्याबाबत अद्याप राज्य सरकारचा कोणताही निर्णय झाला नाही. केंद्र सरकारने आंतरराज्य व राज्यांतर्गत वाहतुकीसाठी निर्बंध हटवण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्य सरकारने यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
पुण्यात 800 बेडची क्षमता असलेल्या जम्बो कोविड सेंटरची उभारणी करण्यात आली असून रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकार्पण केले. त्यावेळी अजित पवार बोलत होते ते म्हणाले की, ई-पास रद्द करण्याबाबत अजून राज्य सरकारचा निर्णय व्हायचा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
दरम्यान, ई पास बद्दल लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यातील आंतर जिल्हा प्रवास करण्यासाठी लागू असलेले नियम शिथील करण्यात येणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. यावर अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार म्हणाले कि, सध्या केंद्राचे पत्र आले असले तरी महाराष्ट्राची परिस्थिती ही अत्यंत वेगळी आहे. याबाबत अंतिम निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करूनच घेतला जाणार आहे.
राज्यात सध्यातरी आंतरजिल्हा बंदी उठवण्यात येणार नाही
राज्यात सध्यातरी आंतरजिल्हा बंदी उठविण्यात येणार नसल्याचे संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. राज्य सरकारने बसच्या आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी दिली आहे. मात्र खासगी वाहतुकीला मात्र बंदी असून ई पास गरजेचे आहे.